बालविवाह : समाजाला लागलेली वैचारिक वाळवी.
     एकीकडे स्री ला देवी समजून तिची पूजा करायची हा संस्कार असताना दुसरीकडे समाजातील एका वर्गात मोठ्या प्रमाणात मुलीला ओझे समजून... अल्पवयातच तिचा विवाह लावून दिला जातो. ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक... कुठल्याच आघाडीवर परिपक्व नसतानाही तिला आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी बालविवाह करण्यात येतो. 
    300 बालविवाह या कोरोना काळात ठरले होते. मराठवाड्यात सर्वाधिक तसेच सोलापूर मध्ये, यातील 255 मोडून काढण्यात सरकारला यश... मुलगी म्हणजे जबाबदारी... खर्च... परक्याचे धन अशा समजुती... तिचं चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे ही मानसिकता.
     तिचं शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, शारीरिक फिटनेस याकडे डोळेझाक करून तिच्या मतांचा विचार न करता तिला परक्या घरी ढकलली जाते. यातील भीषण सत्य म्हणजे महाराष्ट्रातील दर चार  विवाहांमागे एक बाल विवाह होतो.
याचा गंभीर परिणाम म्हणजे
#तिचे शिक्षण थांबते.... त्यामुळे विचार करणे थांबते आणि अर्थातच निर्णय घेणे ही...
#जी स्वतःच शारीरिक सक्षम नसते तिच्यावर अल्पवयातच मातृत्व लादले जाते आणि अशक्त आईचे अशक्त मुल... यानुसार कमकुवत समाज निर्माण होऊ लागतो.
#आयुष्यभर आर्थिक पारतंत्र्य येते आणि "या" घरातील मुलगी अल्पवयातच "त्या" घरची सुन होऊन कायम स्वरुपी पारतंत्र्यात जखडली जाते.
#सध्याच्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात बालविवाहांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते.
    मुलांच्या हक्कांबद्दल झालेल्या संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNCRC) बालविवाह हे मुलांच्या अधिकारावर केलेले अतिक्रमण सांगितले आहे. संवाद, कार्यक्रम, व्यवस्थापने, कायदा या चारही अंगांनी रणनीती आखून या समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्धार, ही समस्या समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार, युनिसेफ आणि ग्रॅव्हिटस फाऊंडेशन ने केला आहे.
 यावर उपाययोजना म्हणजे,प्रत्येक जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध अधिकारी, बालकल्याण समिती, महिला बालविकास विभाग याची अर्ध्या रात्री पण मदत घेऊन बालविवाह थांबवले पाहिजे.
     आपण सगळेच एकत्र येऊन एक लढा उभारूया, समाजाला कमकुवत बनवणाऱ्या या वाळवीपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी सक्रीय होऊया...

#GravittusFoundation #Unicef
#SocialAwareness #ChildRights